चांगल्या आरोग्यासाठी फळं, भाज्या आणि धान्यं खाणं खूप आवश्यक आहे. ते केमिकलयुक्त असतील तर ते तुमच्या आरोग्यासाठी तितकेच हानिकारक आहेत, यामुळे कॅन्सरसारख्या महाभयानक आजारही बळावू शकतो.
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर, फळं-भाज्या लवकर पिकावीत, ताजी दिसावीत यासाठी रसायनांचा वापर आणि अन्नभेसळ यामुळे मानवजीवन धोक्यात आलंय. याकडे लक्ष वेधण्यासाठी होश या किसान दौडचं आयोजन करण्यात आलंय.
किसान दिनाच्या निमित्तानं 23 डिसेंबर, 2018 ला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सकाळी 7 वाजता ही किसान दौड सुरू होणाराय. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित या किसान दौडमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटलही सहभागी होणारायेत. सुमारे १० हजार शेतकरी तर मुंबईच्या टाटा रूग्णालयात उपचार घेणारे जवळपास २०० रूग्ण या दौडमध्ये सहभागी होणारेत.
यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना अंबागोपाल फाउंडेशनचे संस्थापक हरिश शेट्टी म्हणाले, “30 वर्षांपूर्वी फार क्वचितच कॅन्सर झालेले रूग्ण आढळून येतात. मात्र आता शेतीसाठी वापरले जाणारे केमिकल आणि अन्नामध्ये होणारी भेसळ यामुळे हे कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कमी करायचं असेल तर या केमिकलचं आणि अन्नभेसळीचं प्रमाण कमी होणं गरजेचं आहे. या ‘किसान दौड’मध्ये आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीविषयक माहिती देणार आहोत. आयोजित करण्यात आलेल्या वॉकथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं.”
कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय पद्धतीने शेती केली पाहिजे, ग्राहकांनीही सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य खाल्लं पाहिजे. विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य सर्वांना परवडेल अशा पद्धतीने उपलब्धही व्हायला हवं, तसंच येत्या काळात केमिकलयुक्त अन्न उत्पादनावरच बंदी आणायला हवी यासाठी एक याचिकाही होशच्या वतीनं आणली जाणारे.